नाखविणीची खाडी आणि  मुबंईचा कोळी माणूस 

  साधारण गेल्या दीड  वर्षांपासून मी माझी  समुद्रविज्ञानचा विदयार्थी म्हणून जी भूमिका घेऊन महाराष्ट्राचा समुद्र आणि खाडी किनारे पहिले त्यांत भर म्हणून एक अनुभव आज तुमच्या समोर मांडत आहे. ७२० किमी चा आपला किनारा आणि या दर्यावर अधिराज्य गाजवणारा आपला कोळी समाज. आज विविध विकास कामे मुंबईच्या समुद्रा लगत सतत चालू आहेत, पण या धामधुमीत या आपल्या समाजाला या भूमिपुत्राला हद्दपार करण्याचा कट जणू रचला जात आहे . कित्येक कोळीवाडे आणि गावठाणे आज विविध कारण सांगून संपवली जात आहेत. परंतु मुबंई आहे कोळ्यांची नाय कोणाच्या बापाची हीच गोष्ट धरून आपण आपली भूमिका मांडत आहोत. समुद्र संवर्धक  म्हणून माझी भूमिका बजावताना एक इतिहास आणि भूतकालीन तथ्य यांची सांगड घालणे हि देखील महत्वाची गोष्ट आहे. 
  खाडी किनाऱ्या लगत असलेल्या चिखल (Mud flat) आणि गाळ यात कित्येक समुद्री जीव आणि वनस्पती आढळून येतात या खाद्यवर अवलंबून कित्येक पक्षी आज आपल्या किनाऱ्यांवर विचरण करत असतात. ठाणे -ऐरोली फ्लेमिंगो अभयारण्य चा भाग हा असाच समुद्री जीव आणि पक्षी यांनी समृद्ध असलेला भाग. कांजूर-विक्रोळी च्या मध्ये खाडी लगत एक धारा कंदमान नगर पर्यंत जाते त्याची ओळख आज झाली स्थानिक कोळी बांधव याला नाखविणीची खाडी म्हणून ओळखतात. कोण आहे हि नाखविणं म्हणून मी माझ्या स्थानिक मच्छिमार दोस्ताला विचारलं उत्तर मिळालं कि साधारण २०-३० वर्षांपूर्वी एक कोळी महिला आपल्या पती सोबत या भागात वास्तव्याला होती. स्वच्छ प्रदूषणमुक्त  खाडी आणि लोकांचा  कमी हस्तक्षेप यामुळे मुबलक प्रमाणात येथील खाडी मासेमारीसाठी अनुकूल होती. तांब, वरा, चिंबोरी, कोळंबी आणि शिंपले यांमुळे अगदी आनंदी आनंद. चिखलावर वाण लावून मोठ्या प्रमाणत मासेमारी केली जात होती. परंपरा आणि प्रामाणिकता यांमुळे समुद्र संवर्धन होतच होत. आपलं वर्चस्व या किनाऱ्यावर या नाखवींनीं  ने कित्येक वर्ष अबाधित ठेवलं.  मुबंई च्या या  किनारी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटून हि खाडी नाखविणीची खाडी म्हणून आजही नावारूपाला आली.
  हळू- हळू वर्ष सरू लागली काळ झपाटयाने बदलला. ठाणे-बेलापूर आणि ठाणे-वाशी भाग ओदोगिक MIDC च्या रूपात विकास पाऊ लागला. अपुरी जागा आणि वाढती महागाई यामुळे मुबंई ला पर्याय म्हणून नवी मुबंई आणि ठाणे यांकडे लोकांचा ओढा वाढला. लोक आली स्थिरावली, कोळी-आगरी भूमी पुत्रांच्या जमिनी सोन्याच्या खाणी ठरल्या. विकास झाला पण त्याची किंमत पण चुकवावी लागली. माहित नाही कसं पण अचानक एक दिवशी नाखविणं निघून गेली. कुठे आणि का याचं उत्तर अजून कोणाला नाही सापडलं. आज या खाडीची अवस्था कशी असं  प्रश्न विचारला तर माझ्याकडे उत्तर असेल ठीक आहे. आजही कित्येक पक्षी आणि सागरी प्राणी आपलं वास्तव्य या ठिकाणी करून आहेत. पण एक गोष्ट खरी या समुद्र राजाला आणि त्याच्या वैभवाला आज आपण नष्ट करत आहोत.
  हा लेख लिहण्यास कारण एवढंच कि,  एक मासेमारी समाजाचा भाग आणि एक समुद्र विज्ञानाचा विदयार्थी आणि संशोधक म्हणून  या बदलणारी मुंबई, कोळीवाडे आणि समुद्र प्रदूषणाची कथा तुमच्या पर्यंत मांडायची. माहित नाही ती नाखविन आता कुठे गेली परंतु मासेमारी सोबतच आता आपली भूमिका मत्स आणी सागर संवर्धनाची घेतली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने मुबंई कोळ्यांची हि भूमिका आपण अबाधित ठेवू शकतो.

एक सागरपुत्र 
प्रदिप ना. चोगले

( टीप - या खाडीबद्दल आपणांस आणखी काही माहित असल्यास कळवा , आपली प्रतिक्रिया दर्शवा) 
















Comments

Post a Comment